पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील प्रसिद्ध वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे हे तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. वयाच्या ६८ व्या वर्षी साळवे यांनी त्रीना या महिलेशी तिसरे लग्न केले आहे. हरिश साळवे यांच्या विवाह समारंभाला आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, उज्ज्वला राऊत यांच्यासह बॉलीवूड स्टार सलमान खान देखील उपस्थित (Harish Salve Marriage) होते.
पद्मभूषण असलेल्या हरिश साळवे यांनी त्रीना नावाच्या महिलेशी लंडनमध्ये विवाह केला आहे. या विवाह समारंभाला भारतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साळवे आणि त्रीना हे सोबत दिसत आहेत. वकील कुमार मिहिर मिश्रा यांनी साळवी विवाह समारंभाचे फोटो त्याच्या 'X' अकाऊंटवरून शेअर (Harish Salve Marriage) केले आहेत.
माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे याची पहिली पत्नी मिनाक्षी होती. साळवे यांचे पहिले लग्न ३८ वर्ष टिकले. परंतु २०२० मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हरिश साळवे आणि मिनाक्षी यांनी साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत. मिनाक्षी या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर साळवी यांनी ब्रिटीश कलाकार कैरोलीन ब्रोसार्ड हिच्याशी ऑक्टोबर २०२० मध्ये विवाह केला. पण हाही विवाह जास्त काळ टिकला नाही. दरम्यान, ते आता वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा विवाहबंधनात (Harish Salve Marriage) अडकले आहेत.
हरिश साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी १९९२ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी अनेक मोठे खटले लढले आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक उच्च-प्रोफाइल खटल्यात त्यांनी बाजू मांडली आहे. दरम्यान, साळवे यांनी या खटल्यासाठी केवळ १ रूपया शुल्क आकारले होते. त्यामुळे देशभरात त्यांची प्रशंसा झाली.
साळवे हे टाटा समूह, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अनेक आयटीसी समूहाटचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम करतात. अनिल अंबानींच्या रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड विरुद्ध कृष्णा गोदावरी खोरे गॅस विवाद प्रकरणातही त्यांचा प्रमुख सहभाग होता.
२००२ मधील सलमान खानचा हिट अँड रन खटला देखील हरिश साळवे यांच्याकडेच होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २००२ च्या हिट-अँड-रन आणि ड्रंक-अँड-ड्राइव्ह प्रकरणातील सर्व आरोपांमधून खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
२०१८ मध्ये कावेरी पाणी वाटप वादावर केंद्र सरकारच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती.
नोव्हेंबर १९९९ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलेल्या साळवे यांची जानेवारीमध्ये वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांसाठी राणीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
२०१५ मध्ये वरिष्ठ वकील हरिश साळवे यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.