पुढारी ऑनलाईन डेस्क : वाराणसी न्यायालयाने हिंदू भाविकांना ज्ञानवापी संकुलात प्रार्थना करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर काही तासांतच ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली. प्रशासनाच्या देखरेखीखाली ज्ञानवापी येथे पूर्ण विधीपूर्वक पूजा संपन्न झाली. प्रथम लक्ष्मी गणेशाची आरती करण्यात आली, त्यानंतर सर्व देवी-देवतांची पूजा करण्यात आली. तब्बल 31 वर्षांनंतर येथे दिवे लावले गेले, मंदिराची घंटा वाजवली गेली आणि मंत्रोच्चार केला गेला. त्यानंतर आता येथे नियमित पूजा सुरू झाली आहे. (Gyanvapi mosque in Varanasi)
हिंदू पक्षाच्या बाजूचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, व्यास परिवार तहखाना'मध्ये दररोज पूजा सुरू झाली असल्याचे माध्यमांना दिलेल्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने बॅरिकेडिंग केलेल्या सुरक्षितेत व्यासजींच्या तळघरात पूजेला सुरूवात करण्यात आली आहे. वाराणसी न्यायालयाने बुधवार 31 जानेवारी रोजी हिंदू भाविकांना ज्ञानवापी संकुलातील 'व्यास का तहखाना' परिसरात प्रार्थना करण्याची परवानगी दिल्यानंतर ही पुजा संपन्न झाल्याचे देखील विष्णू जैन यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Gyanvapi mosque in Varanasi)
न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन तात्काळ ज्ञानवापी कॅम्पसमध्ये पोहोचले असून काशी विश्वनाथ ट्रस्टच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन पूजेचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. एकीकडे पूजेची जय्यत तयारी सुरू होती, तर दुसरीकडे ज्ञानवापी आणि मंदिर परिसराभोवती चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पुरेशी व्यवस्था केल्यानंतर तळघर स्वच्छ करण्यात आले, त्यानंतर तेथे उपस्थित देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर सर्वप्रथम लक्ष्मी गणेशाची आरती, दीपप्रज्वलन व मंत्रोच्चार करण्यात आले. मध्यरात्री व्यासजींच्या तळघरात ही पूजा करण्यात आली. ही पूजा विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओमप्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेशवर द्रवी यांच्या हस्ते करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजेच्या वेळी तळघरात फक्त पाचच लोक उपस्थित होते. यामध्ये काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओमप्रकाश मिश्रा, गणेशवर द्रवी, बनारसचे आयुक्त कौशल राज शर्मा, एडीएम प्रोटोकॉल यांचा समावेश होता. पूजेनंतर उपस्थित सर्व लोकांना देवाचा प्रसाद व चरणामृत देण्यात आले.
'ज्ञानवापी' संकुलातील व्यासजींच्या तळघरात सन १९९३ पर्यंत पूजा होत होती. हे तळघर व्यास कुटुंबाचे होते. मात्र मुलायमसिंह यादव यांच्या सरकारच्या काळात ते बंद करण्यात आले आणि येथील पुजारीही हटवण्यात आले. व्यासजींचे तळघर भगवान नंदीच्या अगदी समोर आहे.