Latest

सर्वसामान्यांना महागाईची झळ, शेंगदाणे ३० रुपयांनी महागले, भाजीची चव बिघडली

अमृता चौगुले

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा : राज्यात हवामानातील बदल, जास्त काळ रेंगाळलेला पाऊस आदी कारणांमुळे भुईमूग लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घट झाली. सध्या हंगामाचा अखेरचा टप्पा सुरू झाल्याने तसेच गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेंगदाण्याचा पुरवठा कमी झाल्याने दिवाळीपूर्वी 100 रुपये किलोच्या आसपास गेलेला चांगल्या शेंगदाण्याचा दर आता मात्र जानेवारीमध्ये शंभरी पार (130 रुपये प्रतिकिलो) गेला आहे. चांगल्या प्रतीच्या शेंगदाण्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या भाजीची चव मात्र पार बिघडून गेली आहे.

घरच्या जेवणातील भाजीसाठी नेहमी लागणार्‍या शेंगदाण्याचे दर वाढले असले, तरी मागणी मात्र कायम आहे. खाद्यपदार्थ तसेच शेंगदाणा तेलाचा वापर वाढला आहे. त्यामुळे शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतून लवकरच भुईमुगाची आवक सुरू होईल. परंतु जास्त शेंगदाणे ते दक्षिण भारतात पाठवतात. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत आवक होत नाही, तोपर्यंत शेंगदाण्याचे दर असेच चढे राहतील, असे किराणा व्यापार्‍यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले.

शेंगदाण्याबरोबरच ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, डाळी यांचे दरदेखील वरचेवर वाढतच आहेत. या महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगावे तरी कसे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

SCROLL FOR NEXT