पारगाव, पुढारी वृत्तसेवा: मीना नदी पाठोपाठ घोड नदीतही डिंभे (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) धरणातून पाणी सोडल्याने घोड नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. घोड व मीना नद्यांच्या काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. गणपती मूर्ती विसर्जन करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कुकडी प्रकल्पातील डिंभे हुतात्मा बाबू गेनू जलाशय व वडज ही धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे डिंभे धरणातून गुरुवारी (दि. ८) सायंकाळी घोड नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्याअगोदर बुधवारी (दि. ७) व गुरुवारी (दि. ८) सकाळी वडज धरणातून मीना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे दोन्हीही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आंबेगावच्या पूर्व भागातील पारगाव, काठापुर, शिंगवे, वळती, नागापूर, जवळे, भराडी, रांजणी आदी गावांना जलसंपदा विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी (दि. ९) गणेश विसर्जन होत आहे. त्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.