संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण जगावर दोन वर्ष कोरोनाचे संकट आले होते त्यामुळे महाराष्ट्रात दोन वर्ष गणेश उत्सव साजरा झाला नाही. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. आज विसर्जनापूर्वी मानव जातीवर आलेले कोरोनाचे संकट कायमस्वरूपी जाऊ दे असे साकडे माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ गटनेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी गणपती बाप्पाला घातले. संगमनेर शहरातील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्य मानाच्या सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणरायाची आरती माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होऊन गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात पोलीस उपाधीक्षक राहुल मदने आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह सोमेश्वर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.