मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात चार लाख नवीन मतदान यंत्रे पोहचली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ जिल्ह्यात ट्रायल सुरु झाली आहे. उर्वरीत १५ जिल्ह्यात मनुष्यबळाची उपलब्धता झाल्यानंतर या ठिकाणीही ट्रायल सुरु केली जाणार आहे.
कोणत्याही निवडणुकीसाठी मतदानाच्या ६ ते ८ महिन्यांपूर्वी केंद्रीय निवडणुक आयोगाकडून मतदान यंत्रांचे वाटप केले जाते. सध्या देशातील राजकीय घडामोडी पाहता मार्च २०२४ च्या पूर्वीही लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आयोगाने नवीन मतदान यंत्रे पाठविण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सध्या ९७ हजार मतदान केंद्रे आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात यापूर्वी वापरलेली मतदान यंत्रे विविध ठिकाणी सुरक्षित आहेत. या यंत्रांची संख्या आणि याशिवाय लागणाऱ्या यंत्रांची संख्या विचारात घेऊन आयोगाने
भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड व इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांना राज्यात नवीन मतदान यंत्रे पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १ लाख ४८ हजार कंट्रोल युनिट (मतदान केंद्रातील अधिकाऱ्याच्या ताब्यातील यंत्र), २ लाख ५३ हजार बेलेट युनिट (मतदाराने बटन दाबल्यानंतर कागदी प्रत देणारे यंत्र) आणि १ लाख ५७ हजार व्हिव्ही पॅड (बटण असलेले यंत्र) पाठविण्यात आली आहेत.
सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते. या कर्मचाऱ्यांना सदरची मतदान यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सद्या २१ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे, अशी माहिती एका निवडणूक अधिकाऱ्याने दिली.