पुढारी ऑनलाईन डेस्क : Karpoori Thakur Bharat Ratna : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी जारी केलेल्या निवेदनात त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या लोकप्रियतेमुळे जननायक म्हटले जात असे. त्यांचा जन्म बिहारमधील समस्तीपूर येथे 1924 मध्ये झाला होता. ते स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि राजकीय नेते म्हणून ओळखले जात होते. ते बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री राहिले. त्यांनी 22 डिसेंबर 1970 ते 2 जून 1971 आणि 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एका न्हावी कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोकुळ ठाकूर हे शेतकरी होते. कर्पूरी ठाकूर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदवी घेतली. कर्पूरी ठाकूर हे विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. 1942 च्या भारत छोडो आंदोलनातील सहभागामुळे त्यांना ब्रिटीश सरकारने तुरुंगात टाकले. तिथून पुढे ठाकूर यांनी 26 महिन्यांचा तुरुंगवास त्यांनी भोगला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. 1952 मध्ये, ते पहिल्यांदाच बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी ताजपुरी विधानसभा मतदारसंघातून सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर ते सलग चार वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1967 मध्ये त्यांना बिहारचे उपमुख्यमंत्री करण्यात आले. 1970 मध्ये कर्पूरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी गरीब आणि दलितांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.