Latest

…म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले एकत्र; संजय राऊतांनी सांगितलं कारण

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन : राज्यसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना शिवसेना आणि भाजपकडून मतजुळवणीच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवले आहे. यावरून भाजपकडून टीका होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदारांना मतदानाबाबत सुचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र बोलावले असल्याचे सांगितले. तसेच "तुम्ही केलं तर गेट टुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजुला नेलं" अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले. आज मुंबई येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना पश्चिम उपनगरातील मढ आयलंडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये वोल्वो गाड्यातून सुरक्षितस्थळी पाठवण्यात आले. मतदानापर्यंत या आमदारांना आता हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. मते फुटू नयेत यासाठी शिवसेना मोठी खबरदारी घेत आहे. यावरून भाजपने टीका केली होती.

यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत सगळ्याच पक्षाचे आमदार मतदानाला एकत्र जात असतात. आमदारांना मतदानासंदर्भात सुचना द्यायच्या असतात. राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही तांत्रिक असते. त्यासंदर्भात मार्गदशन करण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवले जाते. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनीही आमदारांना एकत्र बाोलावले आहे. त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे कारण नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT