पुढारी ऑनलाईन डेस्क : Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले आहेत. सकाळपर्यंत दोन जवान शहीद झाल्याची बातमी होती. जखमी झालेल्या आणखी तीन जवानांनी अखेरचा श्वास घेतल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे शहीद जवानांचा आकडा पाच झाला आहे. ही चकमक सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
या भागात लष्कराने 2-3 दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे तेच दहशतवादी आहेत ज्यांचा पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर झालेल्या हल्ल्यात हात होता. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी स्फोट केला, ज्यात लष्कराचे जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग आणि जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंग हे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, राजौरी येथून दु:खद बातमी समोर आली आहे. 5 लष्करी जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. दहशतवाद हा एक शाप आहे ज्याने अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे आणि त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. आज आपण ज्यांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.