पोहेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ये-जा करण्यासाठी गोदावरी कालव्यावर छोटा पूल बांधण्यात आला असून या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या पुलावरून विद्यार्थ्यांसह येणार्या जाणार्या नागरीकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. या पुलाची तातडीने दुरूस्ती करण्यात यासी अन्यथा नागरीक आंदोलनाचे हत्यार उपसतील अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सचिन आसणे यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे गोदावरी डाव्या कालव्यावर आहेर वस्ती नजीक जुन्या पाटावर ये -जा करण्यासाठी छोटा पूल उभारण्यात आला, मात्र सध्या त्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून पुलाच्या फळ्या तुटलेल्या आहेत तर लोखंडी रॉड देखील निझुर झालेले आहेत. या पुलावरून शाळेतील विद्यार्थ्यांसह शेतकरी प्रवास करतात.
हा तीन ते चार फुटाचा लोखंडी पूल असून यावर लाकडी फळ्या टाकलेल्या आहेत. मात्र याला अनेक वर्ष उलटल्यानंतर या फुलाची वजन तोलण्याची क्षमता कमी झाली आहे. कालव्याला पाणी आल्यानंतर वस्तीवरील नागरिकांना शेतीची कामे करण्यासाठी तसेच दूध व्यवसायिकांना दूध संकलन केंद्रात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
ब्राह्मणगावात शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना या पुलावरून जाताना मोठा धोका पत्करावा लागतो. याकडेे प्रशासन गांभीर्याने का घेत नाही? याचे मोठे कोडे पडलेले आहे. काही अनुचित प्रकार घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न फुलाची पाहणी करताना सचिन आसणे, छबुराव शिंगाडे, किशोर आहेर यांनी उपस्थित केला.
शाळेतील विद्यार्थिनींना याबाबत विचारणा केली असता पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो, असे सांगितले. यामुळे पाटबंधारे विभागाने व प्रशासनाने तातडीने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सचिन आसणे व ग्रामस्थांनी यांनी दिला आहे.
प्रशासन कधी जागणार
इरशालवाडी सारख्या घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होते. परंतु घटना घडायच्या आत प्रशासन अशा घटना घडू नये म्हणून निर्णय का घेत नाही असा सवाल उपस्थित होतो.