Latest

Chalo Delhi March: ‘चलो दिल्ली मार्च’ अंतर्गत पंजाब- हरियाणा सीमेवर शेतकरी आक्रमक 

अविनाश सुतार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'चलो दिल्ली मार्च' अंतर्गत पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानचे शेतकरी दिल्लीकडे कुच करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार आणि शेतकरी अशा दोन बैठका झाल्यानंतर ठोस काही निष्पन्न न झाल्याने आज दुपारच्या सुमारास पोलीस पंजाब हरियाणाच्या सीमेवरील शंभू बॉर्डरवर प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. दरम्यान, या आधीच विविध राज्यातून दिल्लीत येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. Chalo Delhi March
केंद्र सरकारच्या वतीने तीन मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या चंदीगडमध्ये झाल्या. ८ फेब्रुवारीला पहिली बैठक झाली. मात्र त्या शिष्टाईला यश न आल्याने पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनीधीमंध्ये १२ फेब्रुवारीला दुसरी बैठक झाली. सरकारच्या वतीने केंद्र सरकारने तीन वरीष्ठ मंत्री पियुष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय यांना संयुक्त किसान मोर्चाच्या आणि किसान मजदूर मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यास सांगितले होते.  Chalo Delhi March
शेतकरी आणि केंद्र सरकारमधील दुसरी बैठक चंदीगडमध्ये सोमवारी मध्यरात्रीपर्यंत चालली. मात्र यातुन ठोस काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दिल्ली, शंभू, टिकरी आणि गाझीपूर या तीन प्रमुख सीमेवर लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. काटेरी तारा आणि अन्य पर्याय लावूनही रस्ते बंद करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील काही मेट्रो स्थानकांचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. तसेच दिल्ली-नोएडाच्या सीमावर्ती भागातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पंजाबमधून शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरसह दिल्लीकडे निघाले आहेत. त्यामुळे दिल्ली आणि हरियाणा पोलीस, सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. शेतकऱ्यांचे आंदेलन रोखण्यासाठी अंबाला, जिंद, फतेहाबाद, कुरुक्षेत्र येथे अनेक ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेड्स, मोठे लोखंडी खिळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. हरियाणा सरकारने पोलीस आणि निमलष्करी दलाच्या १०० हुन अधिक कंपन्या तैनात केल्या आहेत. १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी सांगितले की, सरकारने आम्हाला कोणत्याही मागणीवर ठोस आश्वासन दिले नाही. गेल्या वेळीही ज्या मागण्यांसाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती, त्यापैकी अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या, मात्र कोणताही निर्णय घेतला नाही. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीतूनही काहीही साध्य झाले नाही. सरकारने आम्हाला काही प्रस्ताव दिले आहेत. त्यावर आम्ही विचार करू. मात्र, आंदोलन सुरूच राहणार आहे. असेही ते म्हणाले.
संयुक्त किसान मोर्चाच्या आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वात २०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. शेतकऱ्यांची दिल्लीकडे कुच करण्याची मोठी तयारी लक्षात घेवुन कडक सुरक्षाव्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT