पुढारी ऑनलाईन डेस्क : "मी मुख्यमंत्री असताना बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला होता. आम्ही केलेला कायदा आणि रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. बैलगाडा शर्यतीला परवानागी मिळाल्याचा आनंद आहे," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिली आहे.
"बैल हा धावणारा प्राणी आहे, त्यामुळे प्राण्यांवर कोणताही अन्याय करणारा हा कायदा नाही. मी मुख्यमंत्री असताना रिपोर्ट तयार करून कोर्टाकडे सादर केला होता. आम्ही केलेला कायदा पुर्णपणे संविधानीक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. कायदा आणि रोपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय आहे," असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज तामिळनाडूतील पारंपरिक खेळ जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. तामिळनाडूतील जल्लीकट्टू, कर्नाटकातील कंबाला आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना परवानगी देणारे कायदे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा (तामिळनाडू सुधारणा) कायदा, २०१७ हा पारंपरिक खेळांदरम्यान प्राण्यांना होणारा त्रास कमी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच 'जल्लीकट्टू' हा तामिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत जल्लीकट्टू आणि बैलगाडी शर्यतींना परवानगी देणाऱ्या राज्यांच्या कायद्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.
हेही वाचा :