पुढारी ऑनलाईन: गेल्या काही वर्षांत अतिशय सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या डिजिटल पेमेंट इकोसिस्टममुळे प्रशासन, आर्थिक व्यवहार आणि लोकांच्या सामान्य जीवनात सुलभता आली आहे; असे मत पीएम नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. G-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर बैठकप्रसंगी ते बोलत होते.
G20 ची ही बैठक बेंगळुरू येथे होत असून शुक्रवारी या बैठकीचा दुसरा दिवस आहे. या बैठकीला भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित होते. पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, अनेक सरकारी योजनांचे पैसेही डिजिटल पेमेंटद्वारे थेट लोकांच्या खात्यात ट्रान्सफर केले जात आहेत. यासोबतच सर्वसामान्य नागरिक दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी डिजिटल पेमेंटही करत आहेत. भारताचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UPI आणि Pay Now आता सिंगापूरमध्येही काम करतील, असेही ते म्हणाले.
भारत ग्राहक आणि उत्पादकाच्या भविष्याबद्दल आशादायी आहे. तुम्ही सर्वजण या सकारात्मकतेला जागतिक अर्थव्यस्थेमध्ये पसरवाल अशी माझी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत G20 च्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने असे काही फिनटेक प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, ज्यांच्या मदतीने G20 सदस्य, देशांचे पाहुणे भारताचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वापरू शकतील, असेही मोदी यांनी बैठकीवेळी स्पष्ट केले आहे.