मुंबई : दुसरा शनिवार-रविवार, 15 ऑगस्ट आणि पारसी नववर्ष अशा सलग चार सुट्ट्या आल्याने नागरिकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले आहेत. परंतु, याकरिता नागरिकांना, पर्यटकांना ट्रॅव्हल्सच्या प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. 12 ते 16 ऑगस्ट या पाच दिवसांसाठी मुंबई महानगरातून राज्यातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी 50 टक्के भाडेवाढ केली आहे. त्यामुळे कोकण, महाबळेश्वर, नाशिक, शिर्डी, लोणावळ्यासह गोव्याला जाणार्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बुधवारपर्यंत 75 टक्के ट्रव्हल्स फुल्ल झाल्या आहेत.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, मुंबई महानगरातून या पर्यटनस्थळी जाण्यासाठी खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी तिकीट दरात वाढ केली आहे. 12 ऑगस्टपासून मुंबई ते गोवा एसी स्लीपर बसचे भाडे तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे. सध्या हेच भाडे 800 रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत आहे. महाबळेश्वरसाठीही एसी स्लीपरकरिता सध्या एक हजार रुपये आकारले जात आहेत. 12 ऑगस्टपासून दीड ते दोन हजार रुपये आकारले जाणार आहेत; तर एसी सीटिंगकरिता 800 ते 900 रुपये मोजावे लागणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गकरिताही स्लीपर बसचे भाडे 1,300 ते दीड हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे. शुक्रवारी (दि. 11) मुंबईतून सुटणार्या कोल्हापूर, पुणे, पणजी (गोवा), औरंगाबाद, बंगळूर, महाबळेश्वर, हैदराबाद मार्गांवरील सर्व ट्रव्हल्सचे बुकिंग अगोदरच फुल्ल झाले आहे.
गोवा, महाबळेश्वरला सर्वाधिक गर्दी झाल्याने या मार्गावर आणखी 30 टक्के गाड्या चालविण्याचे ट्रॅव्हल्स चालक-मालकांचे नियोजन सुरू आहे.