मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आघाडीत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात अजूनही 15 जागांवर वाद सुरू आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने दिली; तर आघाडीने आम्हाला केवळ दोनच जागा देऊ केल्या होत्या, असा आरोप 'वंचित'च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत आम्हाला सन्मानजनक आणि जिंकणार्या जागा द्याव्यात, आघाडीला टाकाऊ वाटणार्या जागा नकोत, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे.
'मविआ'च्या नेत्यांकडून आमचा योग्य तो सन्मान ठेवला जात नसल्याची तक्रार वंचितकडून वारंवार केली जात आहे. अशातच शुक्रवारी वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना एक पत्र लिहीत जागावाटपाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. वंचितला केवळ 2 जागा देऊ केल्याबद्दल ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दोन मतदारसंघांत वंचितचे काम असले, तरी 'मविआ'चे अस्तित्व कमी आहे. त्यामुळे ही बाब वंचितसाठी त्रासदायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वंचितला सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणार्या जागा द्याव्यात. आघाडीला टाकाऊ वाटणार्या जागा नकोत, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
'वंचित'च्या मतदारांचा पाठिंबा मिळविण्याचा हेतू
शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत आणि काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत, तर काही वाटेवर आहेत. ही पार्श्वभूमी पाहता, 'मविआ'ने फक्त स्वत:च्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित आघाडीकडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्त्वाचे आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटकपक्षांपैकी कोणीही ज्या जागा जिंकलेल्या नाहीत, जाणीवपूर्वक हरणार्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांचा पाठिंबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीचा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. उद्या, शनिवारी होणार्या बैठकीत आपण जागावाटपाचा योग्य निर्णय घेऊन तुमची भूमिका मांडावी. आपण नक्कीच बदलाल, अशी अपेक्षा व्यक्त करत आघाडी टिकविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा विश्वासही रेखा ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.