पश्चिम बंगालमध्ये यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यावरून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घेऊन तेथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या अनेक कंपन्या तैनात केल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी या राज्यात ईडीच्या पथकावर आणि त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकावर हल्ले झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सुरक्षा कर्मचार्यांना नियमांचे उल्लंघन करणार्या कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याचे कडक आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाला तर आम्हाला ठोस पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या कायदा आणि सुव्यवस्था या विषयावरून सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि विरोधी भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली आहे.