पुढारी ऑनलाईन डेस्क : धारावीचा विकास झालाच पाहिजे, तिथल्या लोकांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे. त्यामुळे बीडीडीचा विकास जसा म्हाडा करत आहे, तसा धारावीचा विकास सरकारने करावा, जर टीडीआर बँक करणार असाल तर ती सरकारची असावी, त्यात अदानीचा फायदा नसावा, असे मत व्यक्त करून धारावी ते उद्योगपती अदानींच्या कार्यालयावर १६ डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.५) येथे सांगितले. शिवालय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Uddhav Thackeray
सब भूमी गोपाल' की तसं आता 'सब मुंबई अदानी' की असं आहे का? असा सवाल करत मुंबई अदानींची नाही, तर मराठ्यांची आहे. धारवीत गिरणी कामगारांना आणि पोलिसांनी घरे मिळावीत. धारावीत नीट सर्व्हे होणे गरजेचे आहे. टीडीआरच्या मुद्द्यावरून सरकारने आपली भूमिका जाहीर करावी,असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. Uddhav Thackeray
सध्याचे सरकार हे कंत्राटी आहे. सिनेट निवडणूक घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिले. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. यावर ठाकरे म्हणाले की, सरकारने लोकसभा निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवावी, असे थेट आव्हान त्यांनी सरकारला यावेळी दिले. शिवसेनेची ताकद, ही प्रशासनात असणं की नसणं यावर अवलंबून नाही. शिवसेनेची ताकद रस्त्यावर उतरून जाब विचारणारी आहे,असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा