पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – भाजप युतीची सत्ता आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत, आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मुंबईत आज (दि.२०) आयोजित केलेल्या भाजप मुंबई कार्यकर्ता मेळावा तसेच भाजपचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, आता सर्व उत्सव जोरात साजरे होणार आहेत. दहिहंडी जल्लोषात साजरा झाला. आता गणेशोत्सव उत्साहात साजरा करायचा असल्याचे सांगून यापुढे सर्वच जोरात करायचे असल्याचे सांगून फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुंबईची मोहीम फत्ते करण्यासाठी आशिष शेलार यांची पुन्हा एकदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. हा सामना शेलार नक्कीच जिंकतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत परिवर्तन होणार आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना आणि भाजपचा भगवा महापालिकेवर लागेल. आणि मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेची आणि भाजपची सत्ता येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या निवडणुकीत ३५ वरून ८२ वर आपण गेलो होतो. या निवडणुकीत मागचा रेकॉर्ड मोडायचा आहे, असे सांगून शेलारांना टी २० कसे खेळायचे याची चांगली माहिती आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. आता मुंबई विकास लीग सुरू करायची आहे. सरकारी जागेवरील झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.