मुंबई, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण ठाकरे गटच तीन ते चार लोकांमुळे अस्वस्थ असून, त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
दै. 'सामना'च्या मंगळवारच्या अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख भाजपने खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आणि 13 तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटात 22 आमदार आणि नऊ खासदार अस्वस्थ असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यावरून फडणवीस यांनी ठाकरे गटावर पलटवार केला.
त्यांचा पोपट मेला आहे!
सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना त्यांचा पोपट मेला आहे, हे माहीत आहे; पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशाप्रकारची वक्तव्ये केली जात आहेत; पण या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला.