पुढारी ऑनलाईन डेस्क : निराधार आरोप करू नका, आम्ही मविआ सरकारसोबतच आहोत, असं आमदार देवेंद्र भुयार यांनी आज सांगितले. देवेंद्र भुयार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई येथील ग्रँड हयात हॅाटेलमध्ये येथे बैठक पार पडली. या नंतर भुयार माध्यमांशी बाेलत हाेते.
या वेळी भुयार म्हणाले, नियोजनाच्या अभावामुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. जे आमदार फुटले आहेत त्यांची चौकशी करावी. राज्यसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या टाळाव्यात; पण अपक्षांवर खापर फोडू नये, अशी विनंती खासदार संजय राऊत यांना केली आहे.
मविआला या निवडणुकीत एका जागेचा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संजय राऊत यांनी अपक्षांच्या फुटलेल्या मतांमुळे हा पराभव झाला ,असा आरोप केला होता. गैरसमजामुळे राऊत यांनी आरोप केल्याचे भुयार यांनी सांगितले.
राज्यसभेची निवडणूक संजय पवार विरुद्ध धनंजय महाडिक अशी होती.महाविकास आघाडीचे सर्व नेते संजय पवार यांच्या विजयाची खात्री देत होते. मात्र भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. संजय पवारांच्या पराभवात पडद्यामागील सूत्रधार कोण? पुरेशी मते व राज्यात सत्ता असूनही महाविकास आघाडीची 10 मते फुटली कशी? याचीच चर्चा आता रंगली आहे.
हेही वाचा