पुढारी ऑनलाईन : देशातील २ हजारांच्या नोटांवरील बंदीच्या निर्णयानंतर मंगळवार, २३ मेपासून या नोटा बॅंकेमधून बदलून घेता येणार असून, याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Demonetization in India) जाहीर केले. यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १ हजार रूपयांच्या नोटेसंदर्भात मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, एक हजाराची नोट पुन्हा चलनात आणण्याचा अद्यापतरी कोणताही प्रस्ताव नाही.
सोमवारी (दि.२२) माध्यमांशी बोलताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, सध्या उच्च मूल्याच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय हा आरबीआयच्या स्वच्छ नोट धोरणाचा एक भाग होता. २०१६ च्या नोटाबंदीनंतर २ हजार रूपयांची नोट पुन्हा मागे घेतल्याने दुसऱ्यांदा रिमोनेटायझेशनचा उद्देश साध्य (Demonetization) झाला आहे, असे देखील दास यांनी स्पष्ट केले आहे.
अनेक लोक परदेशात वास्तव्याला आहेत. त्यांना २ हजारांच्या नोटा अंतिम मुदतीत बदलू अथवा जमा करता येण्याची शक्यता कमी आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने विचार केला जात असल्याचेही दास यांनी सांगितले. निश्चलनीकरणाचा आर्थिक व्यवहारावर कुठलाही परिणाम होणार नाही. आर्थिक व्यवहारासाठी २ हजारांची नोट कुठेही वापरली जात नाही, असे वैयक्तिक तसेच अनौपचारिक सर्वेक्षणाचा दाखला देत दास म्हणाले.