पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरेकडील अनेक राज्यात तापमानाचाा पारा घसरला आहे. दरम्यान थंडीमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. काही राज्यांत धुक्यांची घनदाट चादर पसरली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रशासनाकडून पुढील ५ दिवस नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या शांळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Delhi Weather News)
उत्तर भारतात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. पारा घसरल्यामुळे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात दाट धुके आहेत. दिल्लीतील तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. या हवामानाचा परिणाम रेल्वे आणि विमान सेवेवर देखील होत आहे. दाट धुक्यामुळे दिल्लीहून २२ ट्रेन उशिरा धावत आहेत. काही प्रमाणात विमान सेवा प्रभावित झाली असून विमानांच्या वेळेवर याचा परिणाम होत आहे.
दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, सध्याच्या थंड हवामानामुळे दिल्लीतील नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत आहेत. शहरातील शाळा शुक्रवार १२ जानेवारीपर्यंत बंद राहतील, असे देखील आतिशी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. (Delhi Weather News)
दिल्लीसह हरियाणा, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये थंडी संदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये दाट धुके आहेत. पुढील दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या हिवाळी सुट्ट्या १३ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
देशाच्या विविध भागांमध्ये थंडी वाढली असून पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, बिहार, झारखंड, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना पावसाचा इशारा देण्यात दिला आहे. राजस्थान, दक्षिण हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पुढच्या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीच्या आणि धोक्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सोबतच प्रवास करताना संबंधित एअरलाइन्स किंवा रेल्वे यांच्या वेळा जाणून घ्याव्यात, असेही सुचवण्यात आले आहे