नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश तसेच पवन खेडा यांना नोटीस बजावली आहे. स्मृती ईराणी यांची मुलगी गोव्यात अवैध परवान्यावर बार चालवित असल्याचा सनसनाटी आरोप वरील दोन नेत्यांनी केला होता. त्यावरुन ईराणी यांनी उच्च न्यायालयात अवमानना खटला दाखल केला होता.
स्मृती ईराणी यांच्या मुलीवर केलेल्या आरोपांसंदर्भातील ट्विट चोवीस तासात हटवावे, असे आदेशही न्यायालयाने पवन खेडा यांना दिले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करीत गंभीर आरोप केले होते. ज्या बारचा उल्लेख काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे, त्याच्याशी माझ्या मुलीचा काहीही संबंध नाही. वाईट हेतूने मुलीवर आणि माझ्यावर आरोप करण्यात आले असल्याचे स्मृती ईराणी यांनी अवमानना याचिकेत नमूद केले होते.
ईराणी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 18 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. पुढील सुनावणीवेळी जयराम नरेश, पवन खेड़ा आणि नेट्टा डिसूजा यांनी स्वतः न्यायालयात हजर राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.