मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आजपासून शाळांना सुट्टी जाहीर केली असलीतरी ६ मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने शाळांत विविध कार्यक्रम घ्यावेत. याच दिवशी विद्यार्थ्यांना बोलवून निकाल जाहीर करावे व गुणपत्रिका द्याव्यात अशा सूचना केल्या आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी सुटीच्या काळात हे परिपत्रक जारी केल्याने आज शाळांत आलेल्या विद्यार्थ्यांना निकाल द्यायचा की नाही असा संभ्रम शिक्षकांत आहे.
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १ मे पासून शाळांना सुट्टी द्यावी असे आदेश २० एप्रिल रोजी सुधारित आदेश काढला. याच परिपत्रकात उन्हाळी सुट्टी कालावधी जाहीर करत १५ जूनपासून शाळा सुरु कराव्यात अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या होत्या. आता २८ एप्रिल रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. सोमवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिन व ०६ मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्ततेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिन साजरा करून शाळांचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा. विद्यार्थी / पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. यानिमित्ताने शाळा स्तरावर विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करावे अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. दरवर्षी १ मे रोजी विद्यार्थ्यांना बोलवून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी विद्यार्थ्यांनाही निकाल दिला जातो. यंदा मात्र ६ मे रोजी पुन्हा विद्यार्थ्यांना बोलवण्याच्या सूचना दोन दिवसापूर्वी सुटीच्या कालावधीत दिल्या आहेत. सुटी असल्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. शाळांचे नियोजन झालेले असल्यामुळे शेवटच्या टप्यात असे पत्र काढणे चुकीचे आहे. हे पत्र आता अनेक शाळांना शनिवार व रविवारी मिळाले आहे. मुलांना सुट्टीच्या व निकालाच्या सूचना अगोदरच दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय खूप आधी घेणे अपेक्षित होते, असे मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी सांगितले.
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ५० वर्षाखालील शिक्षकांना ऐन उन्हाळी सुट्टीत बीएलओ कामाची ड्युटी लावण्यात आली आहे. १४ जूनपर्यंत शाळांना सुट्टी असणार असून शिक्षकही सुट्टीवर असतील. मात्र या मे महिन्याच्या सुट्टीतच सरसकट सर्वच शिक्षकांना निवडणूक कार्यालयात बीएलओची कामांची नेमणूक दिली आहे. यामुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.