Latest

पाटस परिसरातील पिके गेली वाया, पंचनामे करण्याची शेतकर्‍यांची मागणी

अमृता चौगुले

पाटस, पुढारी वृतसेवा: पाटस (ता. दौंड) परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने पावसाळी पिके, भाजीपाला व नव्याने ऊस लागण केलेल्या पिकात पाणी साचून राहिल्याने शेतपिके वाया गेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे सरकार व कृषी विभागाने करून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पाटस परिसरातील कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव गाडा, वासुंदे, हिंगणीगाडा, माळवाडी, बिरोबावाडी या भागात पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकात पाणी साचल्याने भाजीपाला, टोमॅटो, वांगी मिरची, कोथिंबीर, सोयाबीन अशी पिके वाया गेली आहेत. मुसळधार पावसामुळे तलाव भरण्यास चांगली मदत झाली आहे; मात्र ओढे भरून वाहत असून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचून राहिले असल्याने त्यांची पिके वाया गेली आहेत. या पिकांचे पंचनामे शासनाने करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

मागील 15 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तरकारी पिके, ऊस लागवड, मोठ्या प्रमाणात बाजरी पिके व फळाबागावर परिणाम झाला आहे. शासनाने व कृषी विभागाने या पिकांचे त्वरित पंचनामे करावेत.
बाळासाहेब शितोळे, शेतकरी व माजी उपसरपंच

बाजरी पिकाचे मोठे नुकसान

या पावसामुळे काढणीला आलेले बाजरी पीकदेखील संकटात सापडले असून कुसेगाव, पडवी गावातील काही बाजरी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पावसाच्या पाण्याने ती पिवळी पडू लागली आहेत. यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

SCROLL FOR NEXT