पुढारी ऑनलाईन डेस्क
Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून रोजगार निर्मितीबाबत सकारात्मक संकेत दिले. आत्मनिर्भर भारत मोहीम साध्य करताना प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून पुढील पाच वर्षांत ६० लाख नवीन रोजगार आणि ३० लाख कोटींचे अतिरिक्त उत्पादन निर्माण करण्याची क्षमता आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
चालू वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. (Budget 2022)
"शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजीटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. ", अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प करत असताना शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत होता. सेन्सेक्स ६७० अंकांनी वर आहे. तर निफ्टी १८० अंकांनी वर जाऊन व्यवहार करत आहे.