मुंबई : नरेश कदम : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लोकसभेच्या 19 जागांवर दावा केल्यानंतर आता काँग्रेसने लोकसभेच्या 22 जागांवर दावा ठोकण्याचे ठरविले आहे. याबाबत हायकमांडची मान्यता घेऊन महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.
लोकसभेच्या जागावाटपावरून अजून आघाडीची प्राथमिक चर्चाही झालेली नसताना, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागांचे आकडे सांगायला सुरुवात केली आहे. तर मागील दोन लोकसभेच्या निवडणुकीच्या आधारावर लोकसभेचे जागावाटप न करता मेरिटवर जागावाटप झाले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस नेत्यांच्या कोअर समितीच्या बैठकीत काँग्रेसला अनुकूल लोकसभेच्या जागांची यादी तयार केली आहे. तसेच 2 आणि 3 जूनला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली असून, त्यात पदाधिकार्यांची मते जाणून घेण्यात येतील. प्रदेश काँग्रेसने दावा केलेले लोकसभेचे हे 22 मतदारसंघ काँग्रेसने यापूर्वी जिंकलेले आहेत, असा त्यांचा दावा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेले बुलडाणा, रामटेक , दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रामटेक, हिंगोली या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपात या जागांवरून ओढाताण होऊ शकते.
काँग्रेस मुंबईत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य, उत्तर मुंबई, ठाणे जिल्ह्यात भिवंडी, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, पुणे, उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, रावेर या जागांवर, तर मराठवाड्यात नांदेड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली तर मराठवाड्यात नागपूर, रामटेक, वर्धा, बुलडाणा, चंद्रपूर, अमरावती अशा राज्यात एकूण 22 जागांवर दावा ठोकणार आहे.
हेही वाचा :