लडाख, वृत्तसंस्था : चीनने भारताची हजारो किलोमीटरची भूमी घशात घातली असून ड्रॅगनने एक इंचही भारताची जमीन घेतली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य पूर्णपणे खोटे असल्याची टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.
शुक्रवारी लडाखच्या शेवटच्या दिवसाच्या दौर्यावेळी राहुल गांधी यांनी कारगिलमध्ये एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत-चीन सीमेवर होत असलेल्या हालचालींवर भाष्य केले.
ते म्हणाले, मी लडाखच्या कानाकोपर्यांत गेलो आहे. गरीब, माता-भगिनी आणि तरुणांशी संवाद साधला. त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी मन की बात करतात, मी मात्र विचार केला की देशवासीयांच्या भावना जाणून घेऊयात. लडाखमध्ये मोठी बेरोजगारी आहे. याठिकाणी मोबाईल आणि संवादाची कोणतीही यंत्रणा नाही. लडाखमध्ये विमानतळ आहे, मात्र याठिकाणी कधीच विमान येत नाही. मी येत्या संसद अधिवेशानात लडाखमधील लोकांचा मुद्दा उचलून धरणार आहे. लडाखमधील जमीन भाजप सरकार घेण्याच्या तयारीत असून ही जमीन अदानींच्या घशातच घालण्याच्या तयारीत आहे.
सोनिया गांधी सुट्टीसाठी दाखल
दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दौर्यावर असून ते श्रीनगरमध्ये दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद लुटणार आहेत.
भाजपचा पलटवार
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्तेसुधांशू त्रिवेदी म्हणाले, अखेर सर्व माहिती राहुल गांधी यांना कोण देते? त्यांचे आणि चीनचे निकटचे संबंध आहेत. ते नेहमीच कोणत्याही आधाराशिवाय बोलत असतात.