छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सांप्रदायिक तणाव ही देशाची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. देशाची निर्मिती झाली तेव्हापासून सांप्रदायिक तणावाची समस्या आहे. ती आजही संपलेली नाही, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी शनिवारी (दि. २२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पद्म गौरव सोहळ्यात केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरण केलेल्या गेटचे लोकार्पण माजी राष्ट्रपती कोवींद यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) सायंकाळी लोकार्पण झाले. त्यानंतर विद्यापीठाच्या नाट्यगृहात पदम गौरव सोहळ्यात कोवींद यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु शाम शिरसाट, कुलसचिव भगवान साखळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कोवींद म्हणाले, महाराष्ट्राची भूमी प्रेरणा देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले यांची ही पावनभूमी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि रणभूमी आहे. या विद्यापीठात आलो आहे, त्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे नाव आहे. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण क्षेत्राकडे अधिक झुकलेले होते. नंतर दीनदुबळे, वंचितासाठी ते समाजकार्यात ओढले गेले. ते संविधान निर्माते झाले. स्वातंत्र्यावेळी आणि संविधान निर्माण करतेवेळी पुर्ण देशात सांप्रदायिक वैमनस्याचे वातावरण होते. कधीकधी मी विचार करतो कि, देशाची सगळ्यात मोठी कमजोरी हीच आहे. जेव्हापासून देशाची निर्मिती झाली तेव्हापासून हा सांप्रदायिक तणाव संपलेला नाही. सांप्रदायिक तणावाच्या अनुशंगाने काही जण म्हणत आपण हिंदू, मुस्लिम नंतर आहोत, पण त्याआधी आपण सगळे भारतीय आहोत. पण बाबासाहेब म्हणायचे, आपण आधी भारतीय आहोत, नंतर भारतीय आहोत आणि अंतिमत:ही भारतीय आहोत. त्यांची हीच शिकवण घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त भूमिपुत्रांचा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत फातेमा जकेरिया यांच्यावतीने फराद जमाल यांनी सत्कार स्विकारला. डॉ. यु. म. पठाण आजारी असल्याने त्यांचा मुलगा अतिक पठाण, मुलगी अल्माश पठाण यांनी तर, डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या पश्च्यात त्यांची मुलगी निवेदिता पानतावणे यांनी सत्कार स्विकारला. तसेच शब्बीर सय्यद, गिरीश प्रभुणे, दादासाहेब इधाते, रमेश पतंगे, प्रभाकर मांडे, दादा लाड यांना गौरविण्यात आले.