Latest

पुणे : पाच दिवसांत थंडी कमी होणार; कमाल व किमान तापमानात होणार वाढ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात महाराष्ट्रात कमकुवत होत असल्याने आगामी पाच दिवसांत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा थंडीचा कालावधी कमी असला, तरी मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांत जाणवलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर 5 दिवसांत ( सोमवारपर्यंत) राज्यातून थंडी कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

पहाटेच्या सरासरी किमान तापमानात हळूहळू सुमारे 2-3 अंशांनी वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्यास सुरुवात होईल. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच उबदारपणा जाणवतच होता, तो तसाच अजून पुढील 5 दिवस टिकून राहील.

उत्तरेत 26 जानेवारीपर्यंत थंडी
पावसाळी ढगाप्रमाणे एकामागोमाग पळणार्‍या, पण वेगवेगळ्या उंचीवरून आणि 2-3 दिवसांच्या अंतराने सध्या उत्तर भारतातून सतत जाणार्‍या पश्चिमी झंझावातामुळे उत्तरेत सध्या पाऊस, बर्फ, धुके, थंडी पडत आहे. 19 ते 26 जानेवारीपर्यंत दोन झंझावाताचा परिणाम उत्तर भारतात जाणवेल. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

उत्तरेतील थंडीचा महाराष्ट्रावर परिणाम नाही
उत्तरेतील थंडीचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत नाही. सध्या महाराष्ट्रात जमिनीपासून हवेच्या अधिक उंच जाडीत, अस्तित्वात असलेल्या उच्च दाबामुळे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहणार्‍या प्रत्यावर्ती चक्रीय वार्‍यामुळे (अँटीसायक्लोनिक विंड) उत्तरेकडून आपल्याकडे झेपावणार्‍या थंडीला तयार होणारा रोध, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी अजूनही जाणवू देत नाही. अर्थात, कडाक्याची आवर्तने यापुढेही येऊ शकतात, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT