नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा (Chetan Sharma) मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचे नुकतेच एक स्टिंग ऑपरेशन समोर आले असून या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयाने त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
या स्टिंग ऑपरेशनदरम्यान शर्मा यांनी भारतीय संघ आणि बीबीसीआयबाबत अनेक धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराटला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली. तसेच जसप्रीत बुमराहची दुखापत, हार्दिक पंड्याचे करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेली वक्तव्ये ऐकून भारतीय क्रिकेटरसिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय लवकरच चेतन शर्मांवर कारवाई करू शकते. माजी जलदगती गोलंदाज आणि मुख्य निवडकर्त्यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे. निवडकर्त्याचे पद गेले तर शर्मा यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. कारण, निवड समितीचे अध्यक्ष असल्याने बीसीसीआयकडून शर्मा यांना गलेलठ्ठ पगार दिला जातो, जो आता मिळणार नाही. (Chetan Sharma)
शर्मा यांना बीसीसीआयकडून वर्षाला तब्बल 1.25 कोटी रुपये इतका पगार दिला जातो. जगातल्या कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या निवडकर्त्याला इतका पगार मिळत नाही. आयडल नेटवर्थच्या रिपोर्टनुसार शर्मा यांची नेट वर्थ 5 मिलियन डॉलर्स (41 कोटी रुपये) इतकी आहे; परंतु स्टिंग ऑपरेशननंतर आता शर्मा यांची खुर्ची धोक्यात आहे. त्यांना निवड समितीतून हटवल्यानंतर त्यांचा हा पगार बंद होईल. त्यामुळे त्यांना या स्टिंग ऑपरेशनचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
चेतन शर्मा यांनी सनसनाटी आरोपांची मालिका लावल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अजून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. कारण, अजूनही शर्मा यांच्या सनसनाटी आरोपांनंतर बीसीसीआयच्या गोटातील अस्वस्थता संपलेली नाही. नियमानुसार निवड समितीचे अध्यक्ष अथवा सदस्य यापैकी कोणालाही मीडियाशी थेट बोलण्याची अनुमती नाही.