पुणे; पुढारी वृत्तसेवा : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. सर्वप्रकारच्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा मुख्य वाहतुकीचा असून, या रस्त्यावर पीएमपी बस, चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी होणार्या गर्दीमुळे रस्त्यावर चालणेही कठीण होते. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी वाहतुकीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने फायर ब्रिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका यांना वगळून आवश्यकतेनुसार व वेळेनुसार पीएमपी बस, चारचाकी व जड वाहने यांना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर येण्यास मंगळवारी (दि. 10) गर्दी संपेपर्यत बंदी घालण्यात आली आहे.