पुढारी ऑनलाईन: चांद्रयान-३ मोहिमेचे आज (दि.१४ जुलै) दुपारी श्रीहरीकोटा येथील सतीशधवन केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झाले. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असून चांद्रयान-३ चा हा पहिलाच टप्पा यशसवी पार पडला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, चांद्रयान-३ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आज (दि.१४ जुलै) भारतीय वैज्ञानिकांनी भारत अवकाश क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. भारताची चांद्रयान मोहीम ही केवळ भारतीयांच्या नाही, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या मोहिमेतून अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळणार आहे. या मोहिमेसाठी भारत सरकारने वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या या अवकाश कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.