पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ते सर्व स्क्रिप्टेड होते. पक्षाच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत झालेला तीन दिवसांचा खेळ नौटंकी आणि घरगुती तमाशा होता, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
कसबा मतदारसंघामध्ये बूथप्रमुखांचा महामेळावा सोमवारी बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमध्ये भाजपचा कुठलाही डाव नव्हता.
अजित पवार यांच्याबरोबर गेल्या चार महिन्यांपासून माझा संपर्क झालेला नाही किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत. अजित पवार यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर बोलू नये, असेही बावनकुळे म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून येण्यासाठी कुणाचीही गरज नाही. मोदींच्या नेतृत्वात आम्ही कर्नाटक जिंकूच व तेथे भाजपचे सरकार येईल. मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची कायमच भूमिका असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी शरद पवार यांनी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत, ज्यांच्या घटना बदलून ते अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार दुसर्याला कसे पक्षाचे अध्यक्ष होऊ देतील, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.
लोकशाही कशी असते, हे पाहायचे असेल तर भाजपकडे सर्वांनी पाहावे. दुसर्या पक्षात लोकशाही नसून केवळ
घराणेशाही आहे. त्यांना दुसर्यांना मोठे करायचे नाही, हे सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे 'घर चलो' अभियान राबविण्यात येत असून, याकरिता राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांत आम्ही बूथप्रमुखांच्या बैठका घेत आहोत. पक्षसंघटनेचे काम मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.