छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून भंडाऱ्याकडे जाणारी भरधाव कार समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. यात दोघे ठार तर एक गंभीर जखमी झाला. सुदैवाने कारचालक सहीसलामत आहे. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा पूर्ण चुराडा झाला. ८ मार्च रोजी सायंकाळी ५.५५ वाजता समृद्धी महामर्गावर हर्सूल भागात हा अपघात झाला.
संदीप साखरवाडे (४५) आणि स्वरूप रामटेके (४२, दोघे रा. भैयाजीनगर, भंडारा), अशी मृतांची नावे आहेत. आशिष सरवदे (३७, भंडारा) हे गंभीर जमखी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालक रितेश भानादकर (२४) हा सुखरूप असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
अधिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील अपघात मालिका सुरूच आहे. भंडाऱ्यातील चौघे कारने (क्र. एमएच ४३, एएल ८०२१) मुंबईला गेले होते. ८ मार्च रोजी ते माघारी भडाऱ्याकडे निघाले. त्यांची कार समृद्धी महामार्गाने चॅनल क्र. ४३६ जवळ आली तेव्हा समोर लोडिंग ट्रक (क्र. सीजी १५, डीबी ७१५८) जात होता. ट्रक त्याच्या लेनमधून धावत होता. घाटासारखा रस्ता असल्याने ट्रकची गती अवघी २५ ते ३० प्रती तास होती. त्या ट्रकवर पाठीमागून भरधाव कार धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. को-चालकाच्या बाजुने कार धडकल्याने समोरून सीटवरील एक आणि पाठीमागील सीटवरील एक, असे दोघे ठार झाले. चालक आणि त्याच्या पाठीमागील सीटवरील दोघे जखमी आहेत. सुदैवाने चालकाला किरकोळ जखम आहे. ही माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यावर उपनिरीक्षक मोहन चव्हाण, सहायक फौजदार मुंडे आणि अंमलदार बरडे हे तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मदतकार्य करून कारमधील सर्वांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून घाटीत उपचारासाठी पाठविले. हर्सूल पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघातग्रस्त वाहने बाजुला करून समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
हा भीषण अपघात कारच्या अतिवेगामुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महामार्ग पोलिसांनी काढला आहे. घाटासारखा रस्ता असल्याने लोडिंग ट्रक अगदी २५ ते ३० प्रति तास वेगाने चालत होता. तेथे पाठीमागून जाणारा कारचालक हा १२० पेक्षा अधिक गतीने धावत होता. विशेष म्हणजे, ट्रक त्याच्या लेनमधूनच जात होता. कारचालक ट्रकच्या लेनमध्ये घुसला आणि पाठीमागून धडकला आहे, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.