नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजीच्या आपल्या भाषणात विश्वकर्मा योजनेचे संकेत दिल्यानंतर बुधवारी लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. याद्वारे गुरू-शिष्य परंपरेअंतर्गत कौशल्य कार्यात गुंतलेल्या कामगारांचा कौशल्य विकास केला जाईल.
तेरा हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा फायदा देशातील 30 लाख पारंपरिक कारागिरांना होणार आहे. त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. त्यावरील कमाल व्याज 5 टक्के असेल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात 2 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना दिली. ही योजना 13 हजार कोटी रुपयांची असून, 30 लाख पारंपरिक कारागिरांना याचा लाभ होणार आहे. लहान शहरांमध्ये गुरू-शिष्य परंपरेनुसार कौशल्यासंबंधीच्या कामात विविध वर्ग गुंतले आहेत. यामध्ये लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फूलकाम करणारे, मासे पकडायचे जाळे विणणारे, कुलपे तयार करणारे, शिल्पकार, सुतार आदींचा समावेश होतो. या योजनेद्वारे त्यांना पतपुरवठ्याची सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता मदत केली जाणार आहे.
केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेखेरीज पीएम ई-बस सेवेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेवर 57,613 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी सांगितले. यांतर्गत देशभरात सुमारे 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर या बस चालवण्यात येणार आहेत. 57,613 कोटींपैकी 20,000 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. या योजनेत प्रामुख्याने 3 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असेल.
विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी 'विश्वकर्मा योजना' सुरू करण्यात येणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक साहाय्य देऊन देशभरातील कारागीर आणि कारागिरांच्या क्षमता वाढवणे हा आहे. या योजनेंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी जोडले जाणार असून, त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळू शकेल.