Latest

सोलापुरात : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात, एक महिला ठार तर १४ जखमी; करमाळा-राशीन मार्गावरील घटना

backup backup

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाची उसाच्या ट्रॅक्टरसोबत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. बुधवारी (दि. २८)  रात्री झालेल्या या अपघातात एक महिला ठार, तर 14 जखमी झाले आहेत. यामध्ये 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील व भूम तालुक्यातील आंभी येथील 15 जण एका पिकअपमधून (क्रमांक एम एच 25/ ए जे 4697) आळंदी येथे विवाह सोहळ्याला गेले होते. याचवेळी आंभी येथून विहाळ येथे एक ऊसाचा ट्रॅक्टर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला होता. दरम्यान करमाळा राशीन रस्त्यावर विहाळ गावानजीक रात्री पाऊणे अकराच्या सुमारास ट्रॅक्टर आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील एक महिला जागीच ठार झाली तर 14 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. याचवेळी विट व विहाळच्या युवा वर्गाने अपघात ग्रस्तांसाठी मदतकार्य राबवले. त्यानंतर यातील जखमींना बार्शी तसेच पुणे या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी करमाळा पोलिसांचे वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरा पर्यंत चालू होते.

या अपघातात भूम तालुक्यातील आंभी येथील सुरेखा बारिकराव उबाळे (वय 65) ही वृध्द महिला जागीच ठार झाली आहे. तर वऱ्हाडाच्या पीकअपमधील चौदाजण जखमी झाले आहेत. यापैकी पाच गंभीर जखमी झाले आहेत. राजूबाई सैदुराम गटकळ (वय 35), शिवाजी रामभाऊ भोसले (वय 45), सुरेखा शिवाजी गटकळ (वय 45), कीर्ती शिवाजी गटकळ (वय 18), सुनील शंकर भोसले (वय 45) सर्व रा. आंभी तालुका भूम जिल्हा धाराशिव) हे  गंभीर जखमी आहेत. सिराज नूर मोहम्मद शेख (वय ३०), प्रकाश भोसले (वय ६०), सुमन मुरलीधर गटकळ (वय ५०), बाबासाहेब गोरख गटकळ (वय ३५), पोपट मल्हारी भोसले (वय ७३), सविता रामदेव भोसले (वय ७०), दादा राजू भोसले (वय ७५), संगीता आबासाहेब भोसले (वय ५०), इब्राहिम अब्दुल शेख (वय ५०), सर्व रा. आंभी, ता. भूम, जि. धाराशिव) अशी इतर जखमींची नावे आहेत.

घटनास्थळी पोलिस निरिक्षक जोतिराम गुजंवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपटराव टिळेकर, हवालदार अजहर शेख, बालाजी घोरपडे, वाहतूक विभागाचे प्रदीप जगताप, दीपक कांबळे इत्यादी उपस्थित होते. या अपघातानंतर काही काळ वाहतुक व्यवस्था खोळंबली होती.

SCROLL FOR NEXT