इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा इंडिया आघाडीचे घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडे आहे. त्यामुळे या जागेबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात त्यानुसार इंडिया आघाडीची भूमिका राहील. या जागेबाबत आघाडीच्या वतीने लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी पवार गटाचे जयंत पाटील यांनी दिली.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडी तसेच महायुतीच्या वतीने कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. माजी खा. राजू शेट्टी निवडणुकीसाठी इच्छूक असून, त्यांनी इंडिया आघाडीने बाहेरहून पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली आहे तर शेट्टींनी महाआघाडीकडून निवडणूक लढवावी, अशी मागणी इंडिया आघाडीकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील इंडिया आघाडीच्या पदाधिकार्यांनी उजळाईवाडी विमानतळ तसेच आ. सतेज पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीसंदर्भात चर्चा केली. यावेळी जयंत पाटील यांनी हातकणंगले लोकसभेची जागा 'उबाठा' गटाकडे आहे. या जागेबाबत उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेच्यासंदर्भात लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी इंडिया आघाडीचे मदन कारंडे, संजय कांबळे, माजी आ. राजीव आवळे, नितीन जांभळे, अब—ाहम आवळे, नितीन कोकणे, उदयसिंग पाटील, प्रकाश मोरबाळे, भरमा कांबळे, सदा मलाबादे आदी उपस्थित होते.