मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच सोडवू शकते, या शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाच्या खासदारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.
खासदार विनायक राऊत यांनी त्यासाठी पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या विषयांतर्गत खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ 5 किंवा 6 नोव्हेंबर रोजी भेट घेऊ इच्छितात. आपल्या सोयीनुसार वेळ द्यावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राष्ट्रपतींना भेटणार्या शिष्टमंडळात खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांचा समावेश आहे.