कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सीमावादावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस अधिकार्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. अप्पर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. के. सारंगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांचा समावेश आहे.
सीमाभागात शांतता राखण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. त्यातील चर्चेनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे सीमा प्रश्नावरून निर्माण होणार्या ताणतणावावर दोन्ही राज्यांतील अधिकारी पातळीवर चर्चा होऊ शकेल.