मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यासाठी भारतीय जनता पक्षाने देशभरातील नागरिकांकडून सूचना मागविण्याची मोहीम हाती घेतली आहे. भाजपचा हा जाहीरनामा म्हणजे विकसित भारताचा संकल्प असणार आहे. त्यासाठी सूचना मागविण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत मुंबई भाजपने 15 मार्चपर्यंत 2 लाख सूचना गोळा करण्याचा निर्धार केला आहे.
संबंधित बातम्या
दादर येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आ. आशिष शेलार यांनी या अभियानाची माहिती दिली. भाजपने निवडणूक प्रचाराच्या तयारीत आघाडी घेतल्याचे सांगून शेलार म्हणाले, विकसित भारत नेमका कसा असायला हवा? विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे चित्र उमटावे म्हणून मुंबई भाजप थेट मुंबईकरांकडे जाऊन दोन लाख सूचना गोळा करणार आहे. मुंबईतही 15 मार्चपर्यंत संकल्प पत्र अभियान राबविण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानके व सार्वजनिक ठिकाणी सूचना पेटी ठेवली जाईल. पदाधिकारी घरोघरी जाऊनही सूचना गोळा करतील. यात सीए, वकील, शिक्षक, डॉक्टर, आयटी प्रोफेशनल्स, व्यापारी, गायक, अभिनेता, खेळाडू, अभियंते, माजी सैनिक, पत्रकार आदींकडून सूचना घेतल्या जातील. लोकसभा विधानसभा क्षेत्रातून संकलन पेटीच्या माध्यमातून सूचनांचे संकलन केले जाईल.
9090902024 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देऊन संकल्पपत्राच्या सूचना रेकॉर्ड करता येणार आहेत. हा नंबर ही मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप हे अभियान राबविणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवरूनही सूचना पाठविता येतील, अशी माहिती शेलार यांनी दिली. देशाच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य माणसांची मते, अपेक्षा, सूचना घेण्याची ही पहिलीच वेळ असावी, असेही त्यांनी नमूद केले.