Latest

Delhi Pollution Issue : प्रदूषणाच्या मुद्द्यावर दिल्ली सरकार विरुद्ध भाजपचे राजकीय फटाके

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Delhi Pollution Issue : प्रदूषणाच्या मुद्द्यावर दिल्लीत पुन्हा एकदा आपचे दिल्ली सरकार विरुद्ध भाजप असे राजकीय फटाके उडवायला सुरुवात झाली आहे. दिवाळीत दिल्लीत फटाके उडवण्यात आल्यामुळे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. बंदी असतानाही फटाके विक्रीला भाजपच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादनावर, साठवणुकीवर आणि विक्रीवर बंदी होती, या बंदीची काटेकोर अंमलबजावणी झाली असती तर दिल्लीचे प्रदूषण एका रात्रीत 100 अंकांनी वाढले नसते. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे पोलीस भाजप सरकारकडे आहेत. त्यामुळे फटाके दिल्लीत आणण्यासाठी भाजप जबाबदार आहे असा आरोप दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केला आहे. (Delhi Pollution Issue)

पुढे बोलताना ते म्हणाले की, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर भाजप सरकारचे नियंत्रण आहे. या तिन्ही पोलिस दलांच्या देखरेखीखाली कोणताही सामान्य माणूस सहजासहजी फटाके पुरवू शकत नाही. हे सर्व काही विशेष लोकांच्या संरक्षणाखाली घडले. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी देखील गोपाल राय यांनी केली आहे. याशिवाय पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग मंदावण्याची शक्यता आहे, ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. अशा स्थितीत दिल्लीतील जनतेला प्रदूषणाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी दिल्लीत बीएस 3 आणि बीएस 4 वाहनांवर बंदी 'जैसे थे' ठेवण्यात आली आहे. तसेच श्रेणीबद्ध उपाय योजनांचा चौथा टप्पाही लागू ठेवण्यात आला आहे. (Delhi Pollution Issue)

दरम्यान गोपाल राय यांच्या वक्तव्यावर दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा आणि खासदार मनोज तिवारी यांनी टीका करत खरपुस समाचार घेतला आहे.

SCROLL FOR NEXT