पुढारी ऑनलाईन डेस्क: खासदार नवनीत राणा यांचे 'जात प्रमाणपत्र' वैध असल्याचा निर्णय आज (दि.४) सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले हाेते. या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राणा यांचा आगामी लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाच्या या निकालामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वी राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध आहे की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निकाल दिला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राणा आज अमरावतीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील दसरा मैदानात सभा सुरु असतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
नवनीत राणा यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत राखीव प्रवर्गातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र फसवणुकीने मिळविल्याच्या कारणावरून रद्द केले होते. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल आला आहे.
नवनीत राणा यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात महायुतीमध्ये बंड झाल्याचे दिसून येतेय. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी देखील तो राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत स्वतंत्र उमेदवार दिला आहे. भाजपमध्ये स्थानिक पदाधिकारी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर नाराज असल्याची चर्चा आहे.