गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत सत्तारूढ आघाडीने एकहाती सत्ता मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत परिवर्तन आघाडीकडून लढलेल्या अनेक मातब्बरांना पराभवाचा धक्का बसला आहे.
पराभूत उमेदवारामध्ये जिल्हा बँकेच्या दोन मातब्बर संचालकासह, बिद्रीचे विद्यमान व्हाईस चेअरमन, तीन विद्यमान संचालक आणि काही माजी संचालकांचा समावेश आहे.
या निवडणुकीत ना. हसन मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील आणि विद्यमान चेअरमन के पी पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला सभासदांनी भरभरून मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तारूढ आघाडीने आपल्या पॅनलमध्ये केवळ 8 विद्यमान संचालकांना संधी दिली होती. तर 17 नवे चेहरे देण्याचे धाडस केले होते. सत्तारूढ आघाडीला या पॅनल रचनेचाही फायदा झाल्याचे मतांच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा केडीसीचे विद्यमान संचालक ए वाय पाटील, दुसरे संचालक प्रा. अर्जुन आबीटकर, गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, बिद्रीचे विद्यमान व्हाईस चेअरमन विठ्ठलराव खोराटे, विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील, युवराज वारके, एकनाथ पाटील, माजी संचालक केजी नांदेकर, दत्ताजीराव उगले,नंदकिशोर सूर्यवंशी, संजय पाटील,भाजपाचे संघटन मंत्री नाथाजी पाटील, बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब भोपळे या मातबरांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील हे पराभूत झाले असले तरी धनाजीराव देसाई आणि फिरोज खान पाटील या गोकुळच्या दोन माजी संचालकांनी मात्र सत्तारूढ आघाडीतून विजय मिळवीला आहे.
या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीतुन संधी मिळालेले आठ विद्यमान संचालक विजय झाले तर तीन माजी संचालकांचे बिद्रीच्या सत्तेत पुनरागमन झाले आहे. शिवाय तीन माजी संचालकांच्या नातेवाईकांनाही पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सत्तारूढ आघाडीने संधी दिलेल्या तब्बल 11 चेहऱ्यांना पहिल्यांदाच कारखान्याच्या संचालक पदाची लॉटरी लागली आहे.