नाशिक : पुढारी वृत्तसेवा– रश्मी ठाकरेंमध्ये मला माँसाहेब दिसत आहेत. त्यांच्यासारखी संयमी आणि विनम्र महिला, आदर्श राज्यकर्त्याची पत्नी आणि शांत आई आम्ही शिवसैनिकांनी बघितली आहे. यापूर्वी हे सर्व आम्ही माँसाहेबांमध्ये बघत होतो. आता रश्मी ठाकरेंमध्ये बघत आहोत. आपल्या राज्यकर्त्यांना ४० कोल्ह्यांनी गादीवरून हटवले, त्यांना धडा शिकविण्यासाठी आता आपण मैदानात यावे, असे आवाहन रश्मी ठाकरे यांना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेत केले.
भारतीय जनता पक्षावर टीका करताना त्यांनी निमंत्रण देणे हे सौजन्य आणि संस्कृती असते. उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही. त्या निमंत्रणाची आम्ही अपेक्षासुद्धा केली नाही. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत राममंदिर लोकार्पणाचा जो सोहळा केला ती संधी देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती मुर्मुंना द्यायला हवी होती. या सोहळ्यात त्यांनी कारसेवक, शिवसैनिक यांचा सन्मान करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नाही.
देशातील प्रमुख चार पिठांमधून हिंदूधर्माची दीक्षा दिली जाते, त्या पिठांच्या प्रमुख शंकराचार्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने तमाम हिंदूंचा अवमान मोदी यांनी केला आहे. त्यांचे लघू- सूक्ष्म मध्यम खात्याचे मंत्री शंकराचार्य कोण? असा सवाल करतात. ज्यांचे डोळे नीट उघडत नाही ते असा सवाल करतात, अशी टीका नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांनी केली.
नाशिकमध्ये १९९४ मध्ये सभा झाली होती आणि १९९५ ला राज्यात आपले सरकार आले. आता २०२४ मध्ये नाशिकमध्ये सभा होत आहे. तेव्हा आपण विरोधकांविरुद्ध लढलो होतो, आता स्वकियांविरुद्ध लढत आहोत. ज्यांनी आपला विश्वासघात केला आहे, त्यांना निवडणुकीतून उत्तर द्याचचे आहे आणि गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा :