राशीन, पुढारी वृत्तसेवा: बारामती – अमरपूर राज्यमार्ग सुसाट झाला खरा; पण हा राज्यमार्ग अतिशय धोकादायक व जीवघेणा बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. गतिरोधक अथवा दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. गतिरोधका अभावी वेग मर्यादेला नियंत्रण आणता येत नसल्याने राजेभोसले – लाहोर – सपाटेवस्ती, करपडी फाटा, चौकीचा लिंब, जगदंबा विद्यालय राशीन या ठिकाणी गतिरोधक आवश्यक आहे, तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसविणे आवश्यक आहे. जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल. रस्ता पूर्ण झाल्यापासून अपघातांची मालिका सुरू आहे. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा रस्ता लोकांच्या जीवावर उठला आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून येत आहे.
अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही कुठल्याच प्रकारची कार्यवाही होत नाही. नुकतीच राजेभोसले वस्तीनजीक दुचाकीने धडक दिल्याने मोढळे वस्तीवरील बाळू तुरकुंडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात मृत्यू झाला होता. राज्यमार्ग 68वर एकाच वर्षात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
बारामती – अमरापूर राज्यमार्गावर राजेभोसले वस्ती, सपाटे वस्ती, चौकीचा लिंब, करपडी फाटा या ठिकाणी वारंवार अपघात होतात. याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. या ठिकाणी गतिरोधक बसवावे यासाठी वारंवार निवेदने दिले. आता लक्ष दिले नाही, तर आम्ही आंदोलन करू.
– डॉ. विलास राऊत, राशीन.