मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कागद महागल्याने बालभारतीच्या पुस्तकांच्या किमतीही ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. बालभारती पुस्तक आम्ही ९० टक्के मुलांना मोफत देत आहोत. पण, कागदाच्या किंमती वाढत असल्याने ३० टक्के वाढ करण्यात आली आहे, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शिवाय श्रीमंतांना मोफत पुस्तके देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, वह्या, शूज व सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर वहीचे एक पान जोडले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या दप्तराचे ओझेही कमी होणार असल्याचे मंत्री केसरकरांनी सांगितले.
पुढील वर्षापासून दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत, ही अफवाच आहे. असा कोणताच निर्णय झालेला नाही. उलट दहावी-बारावीप्रमाणे इयत्ता आठवीच्या परीक्षा घेण्याचा आमचा मानस असल्याचे मंत्री केसरकरांनी सांगितले.