पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या राजकारणामध्ये सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मने जिंकणारा नेता तसा विरळाच. मात्र ही किमया भाजपचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी साधली होती. पंतप्रधान म्हणून देशाचे तीन वेळा नेतृत्व करणारे वाजपेयी हे कवी मनाचे होते. त्याचप्रमाणे राजकारणा व्यतिरिक्त ते चित्रपट आणि कला रसिक देखील होते. उत्कृष्ट कलाकृतीला दाद देणे, त्यांचे कौतुक करणे, कलाकारांची पाठ थोपटणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे ही अटलजींचे वैशिष्ट्य होते. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी. राजकारणापलीकडील अटल बिहारी वाजपेयी यांना जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या जीवनातील हा किस्सा वाचा… (Atal Bihari Vajpayee Death Anniversary)
अभिनेत्री स्मिता पाटील (Atal Bihari Vajpayee Birth Anniversary) म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक 'सोनेरी पर्व'. दूरदर्शन वृत्तनिवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री असा त्यांचा प्नवास. स्मिता यांनी अभिनय 'जगणं' म्हणजे काय? हे आपल्या समकालीन पिढीला शिकवलं. त्यामुळेच आजची पिढीही त्याचे स्मरण 'जिवंत अभिनय' याच शब्दांमध्ये करते. त्यांच्या अभिनयाने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी प्रभावित झाले होते. उंबरठा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी स्मिता यांना फोन करुन "अरे बेटी, तुमने हम को बहुत रुलाया।" अशी प्रतिक्रिया दिली होती.
चित्रपट सुरु झाला. वाजपेयी यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला. त्यानंतर ते जब्बार पटेल यांना म्हणाले, "या चित्रपटातील मुलीने मला खूप रडवलं. त्या मुलीचा मला फोन नंबर हवा आहे. ही मुलगी शिवाजीराव पाटील यांची मुलगी आहे ना? तिचा फोन नंबर असेल तर मला द्या."
जब्बार पटेल यांनी स्मिता पाटील यांना फोन लावला. "स्मिता, अटलबिहारी वाजपेयी यांना तुझ्याशी बोलायचं आहे. त्यांनी आता आपली फिल्म बघितली आहे." त्यावर स्मिता म्हणाल्या, "तुम्ही मला का सांगितलं नाहीस मी आले असते. हा संवाद झाल्यानंतर वाजपेयी आणि स्मिता यांच बोलणं सुरु झालं. त्यानंतर तब्बल अर्धा-पाऊण तास ते बोलत होते. बोलत असताना अटलबिहारी वाजपेयी स्मिता यांना पुन्हा पुन्हा म्हणतं होते, "अरे बेटी, तुमने हम को बहुत रुलाया।".जब्बार पटेल यांच्याशी बोलताना वाजपेयी म्हणाले, जब्बार या चित्रपटातील प्रभावशाली काय असेल तर ते म्हणजे या चित्रपटाचा अंतिम दृश. या दृश्यात स्मिताचे जे स्मित हास्य आहे ते खूप विलक्षण आहे.
स्मिता यांच वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झालं. एकदा जब्बार पटेल वाजपेयी यांना भेटले तेव्हा स्मिता यांची आठवण निघाली. जब्बार यांनी जेव्हा स्मिता पाटील यांच्या निधनाची बातमी सांगितली तेव्हा हळहळून वाजपेयी म्हणाले, "वह बेचारी बच्ची चली गई, उसने मुझे बहुत रुलाया।"
कवी मनाचा राजकारणी ते देशाला कणखर नेतृत्व देणारे वाजपेयी यांचे स्मरण आजच्या आणि येणार्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. वाजपेयी हे १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते. १९५१ मध्ये भारतीय जनसंघातून त्यांनी आपला राजकीय जीवनाला सुरुवात केली. १९५७ मध्ये बालारामपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. यानंतर तब्बल चार दशकांहून अधिककाळ त्यांनी राजकारणात आपले योगदान दिले. अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
हेही वाचा