पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup Dispute : आशिया चषक स्पर्धेतील सहभागावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद सुरू आहेत. बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार नाही, तर पाकिस्ताननेही प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, असे झाल्यास त्यांचा संघ वनडे विश्वचषकासाठी भारतात येणार नाही. आता या समस्येचे निराकरण करण्यासाठी आयसीसीला पाऊल उचलावे लागेल.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या संघाच्या सहभागावर चर्चा करण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ ज्योफ अॅलार्डिस लाहोरमध्ये पीसीबी प्रमुख नजम सेठी यांची भेट घेतील. आयसीसीचे वरिष्ठ अधिकारी पीसीबीचे सीओओ बॅरिस्टर सलमान नसीर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. जर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर त्यांचे सामने बांगलादेशात खेळवण्याची मागणी करणार असल्याचे सेठी यांनी म्हटले आहे. पण बार्कले आणि अॅलार्डाईस हे भारत आणि पाकिस्तानचे सामने ढाका येथे होऊ नयेत यासाठी गतिरोध तोडण्याचा प्रयत्न करतील, असे समजते आहे.
पीसीबीच्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि अगदी नेपाळनेही जय शहा यांना कळवले आहे की त्यांना काही सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यास कोणतीही अडचण नाही. तर उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत व्हावेत. बार्कले प्रथमच पाकिस्तानला भेट देणार आहेत. 2008 मध्ये आयसीसीचे अध्यक्ष रे माली यांच्यानंतर पाकिस्तानला भेट देणारे बार्कले हे पहिले आयसीसी अध्यक्ष असतील. ऑक्टोबर 2004 नंतर आयसीसीचे दोन्ही उच्च अधिकारी पीसीबीच्या मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. (Asia Cup Dispute)