नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी ( lakhimpur kheri case ) येथे शेतकर्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आशिषला जामीन दिला होता.
आशिषच्या ( lakhimpur kheri case ) जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी याचिका अॅड. शिवकुमार त्रिपाठी आणि सी. एस. पांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत असून तो पुराव्यांशी छेडछाड करु शकतो. याशिवाय साक्षीदार, शेतकरी आणि पीडितांच्या कुटुंबियांना त्याच्यापासून धोका आहे. राज्य सरकार तसेच केंद्राने पीडितांच्या कुटुंबियांना तात्काळ भरपाई दिली पाहिजे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने पाच हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात याआधीच दाखल केलेले आहे.